
अमरावती, 28 मार्च (हिं.स.)
जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचनेच्या कार्यक्रम प्रक्रियेतून विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्यावरील कामाचा ताण पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. आता एसडीओंकडे सुनावणी व तहसीलदारांकडे प्रभाग रचना अंतिम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्य शासनाने ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदलकरत सुधारित आदेश जारी केला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. याकरिता ७ ते १३ एप्रिल दरम्यान प्रभाग रचनेवर हरकती व आक्षेप स्वीकारले जाणार आहे. या कार्यक्रमानुसार १६ एप्रिल रोजी एसडीओंकडे आक्षेपांवर सुनावणी होणार होती. यामध्ये आता बदल करीत जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालयांवर ताण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ही प्रक्रिया अधिक सुलभकरण्यासाठी बदल केले आहेत.---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी