
नवी दिल्ली, 31 मार्च (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरीनामचे माजी राष्ट्राध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सुरीनामचे माजी राष्ट्राध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी यांच्या निधनामुळे केवळ सुरीनामसाठीच नव्हे तर जगभरातल्या भारतीय समुदायासाठी कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांच्यासोबतच्या आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला. संतोखी यांनी सुरीनामची अविरत सेवा केली आणि भारत-सुरीनाम संबंध दृढ करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न, त्यांच्या संवादांतून स्पष्टपणे प्रतिबिंबित होत असत.
संतोखी यांना भारतीय संस्कृतीबद्दल वाटणाऱ्या विशेष आत्मीयतेचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. त्यांनी जेव्हा संस्कृत भाषेत शपथ घेतली होती तेव्हा अनेकांची मने जिंकली होती, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट मध्ये लिहल की, ''माझे मित्र आणि सुरीनामचे माजी राष्ट्राध्यक्ष, श्री. चंद्रिकाप्रसाद संतोखी जी यांच्या आकस्मिक निधनामुळे मला अत्यंत धक्का बसला असून मी अतिशय दुःखी झालो आहे. ही केवळ सुरीनामचीच नव्हे, तर जगभरातील भारतीय समुदायाचीही कधीही भरून न येणारी हानी आहे.
त्यांच्यासोबत झालेल्या अनेक भेटींच्या आठवणी मनात दाटून येत आहेत. सुरीनामसाठीची त्यांची अविरतसेवा आणि भारत-सुरीनाम संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, आमच्या संवादामध्ये स्पष्टपणे प्रतिबिंबित होत असत. भारतीय संस्कृतीबद्दल त्यांना विशेष आत्मीयता होती. त्यांनी जेव्हा संस्कृत भाषेत शपथ घेतली होती तेव्हा अनेकांची मने जिंकली होती. दुःखाच्या या प्रसंगी, मी त्यांच्या कुटुंबियांप्रति आणि सुरीनामच्या जनतेप्रति माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. ॐ शांती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule