
बीड, 05 मार्च, (हिं.स.)। जिल्ह्यातील तेलघना येथील कांदा उत्पादक शेतकरी सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. आखाती देशांतील या संघर्षामुळे कांद्याची निर्यात पूर्णपणे विस्कळीत झाली असून, त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेतील दरांवर झाला आहे. दरवर्षी २५ ते ३० रुपये मिळणारा भाव यंदा कोसळल्याने, आपला माल हैदराबादला विक्रीसाठी नेणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.
आधीच अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान केलेले असताना, आता युद्धाच्या जागतिक संकटामुळे शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले आहेत. बँक आणि सावकारांचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत असलेल्या बळीराजाने आता सरकारने कांद्याला किमान ३० रुपये हमीभाव देण्याची आर्त साद घातली आहे. वेळीच सरकारी मदत न मिळाल्यास अनेक शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली असून, प्रशासनाने या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis