
लखनौ, 11 एप्रिल (हिं.स.)। यमुना नदी मध्ये शुक्रवारी उलटलेल्या मोटरबोटमधील सात भाविकांचा अद्यापही काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. रात्री 1 वाजेपर्यंत बचावकार्य केल्यानंतर सकाळी साडेपाच वाजल्यापासून पुन्हा एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे डायव्हर्स 20 मोटरबोटींसह यमुना नदीत उतरले आहेत. सुमारे 10 किमी परिसरात हरवलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे, मात्र अद्याप कोणताही मागमूस लागलेला नाही.
प्रशासनाच्या यादीत सध्या पाच जण बेपत्ता असल्याचे नमूद आहे, परंतु काही अशा कुटुंबीयांनीही तक्रार केली आहे ज्यांचे सदस्य बोटीत होते आणि अजूनही गायब आहेत. त्यामुळे एकूण बेपत्ता भाविकांची संख्या सात मानली जात आहे.
शुक्रवारी दुपारी लुधियाना येथील भाविकांचा एक गट वृंदावन येथील केशी घाट वरून यमुना नदी पार करून देवराहा बाबा समाधी स्थळ येथे दर्शनासाठी जात होता. यमुनेवर उभारण्यात आलेल्या पाँटून पुलाच्या जोडणीदरम्यान, जोरदार प्रवाहामुळे पुलाचा पीपा मोटरबोटीला धडकला आणि बोट उलटली. या अपघातात बोटीत असलेले 37 हून अधिक भाविक नदीत पडले. परिसरातील डायव्हर्सनी 22 जणांना वाचवण्यात यश मिळवले, तर 10 भाविकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र उर्वरित सात जण अद्याप बेपत्ता आहेत.सुरेश चंद्र रावत आणि डॉ. पंकज वर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथके यमुना नदीत बेपत्ता भाविकांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्या 10 भाविकांचे मृतदेह पोस्टमॉर्टमनंतर रात्री उशिरा पंजाबकडे रवाना करण्यात आले. लुधियानातील मृतांचे मृतदेह सकाळी 10 वाजता त्यांच्या घरी पोहोचले, तर जगरांव येथील भाविकांचे मृतदेह दुपारी पोहोचणार आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीपी सिंह यांनी डॉ. पंकज वर्मा यांच्याकडे सोपवली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode