
रायगड, 16 एप्रिल (हिं.स.)। रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा चांगलाच चढला असून नागरिक हैराण झाले आहेत. हवामान विभागाने पुढील ४ ते ५ दिवसांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याने जिल्हा आरोग्य विभागाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
विशेषतः सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, कारण या कालावधीत तापमान ४५ ते ५५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उष्माघाताचा धोका वाढल्याने घुसमटल्यासारखे वाटणे, चक्कर येणे किंवा अचानक तब्येत बिघडल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे सांगण्यात आले आहे.
घरातील दरवाजे-खिडक्या उघड्या ठेवून वायुवीजन राखावे. शक्यतो दही, ताक, बेलफळाचा रस यांसारखे थंड पेय सेवन करावे. पुरेसे पाणी व द्रवपदार्थ पिणे अत्यावश्यक आहे. तसेच गॅस सिलिंडर उन्हात ठेवू नये, वीजमीटरवर अतिरिक्त भार टाळावा आणि एसीचा वापर मर्यादित ठेवावा.
आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहून उष्णतेपासून बचाव करण्याचे आणि इतरांनाही याबाबत जागरूक करण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)