एकल महिलांसाठी कार्यवाही संवेदनशीलतेने पार पाडा – नांदेड जिल्हाधिकारी
नांदेड, 16 एप्रिल (हिं.स.)।मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत विधवा व घटस्फोटीत (एकल) महिलांसाठी आवश्यक असलेली सर्व कार्यवाही अत्यंत संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित
एकल महिलांसाठी कार्यवाही संवेदनशीलतेने पार पाडा – नांदेड जिल्हाधिकारी


नांदेड, 16 एप्रिल (हिं.स.)।मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत विधवा व घटस्फोटीत (एकल) महिलांसाठी आवश्यक असलेली सर्व कार्यवाही अत्यंत संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत थोरात, साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी तसेच महिला व बाल विकास विभाग, माविम, उमेद, जिल्हा कौशल्य विकास विभाग आदींचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने 1 मे रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले. या ग्रामसभांमध्ये अंगणवाडी सेविकांनी केलेल्या सर्वेक्षणातील एकल महिलांची यादी सादर करून त्यांच्या गरजा, समस्या व आवश्यक कागदपत्रांबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे सांगण्यात आले. तसेच ग्रामपातळीवर एकल महिलांची अचूक संख्या निश्चित करून त्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याबाबतही ग्रामसभेत चर्चा करण्याचे निर्देश देण्यात आले. संबंधित अहवाल तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समितीकडे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

एकल महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात माविम व उमेद अभियानाच्या माध्यमातून मेळावे व प्रेरणा कार्यशाळा आयोजित करण्यावर भर देण्यात यावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन’ योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजू बालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शाळांमार्फत अर्ज मागविण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त शाळांमध्ये एकल पालक असलेल्या बालकांचे सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांचे अर्ज तयार करून तालुकास्तरीय संरक्षण अधिकाऱ्यांकडे सादर करावेत, असेही सांगण्यात आले.

एकल महिलांकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्यास ती पहिल्या टप्प्यात 15 दिवसांच्या आत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. यामध्ये आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, पतीचा मृत्यू दाखला, जॉब कार्ड आदी कागदपत्रांचा समावेश असून, ग्रामविकास विभागाने तहसीलदार व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या समन्वयातून यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande