
पुणे, 16 एप्रिल (हिं.स.)।
शहरात वाहिनीद्वारे नैसर्गिक गॅस (पीएनजी) जोडणी बंधनकारक करण्यात आल्यानंतर नवीन जोड घेण्यास अभूतपूर्व वेग आला आहे. गेल्या एका महिन्यात तब्बल १४ हजारांहून अधिक नव्या जोडण्या देण्यात आल्या आहेत. यापूर्वी दरमहा सरासरी पाच हजार जोडण्या घेतल्या जात होत्या. मात्र अचानक वाढलेल्या मागणीमुळे ही संख्या जवळपास तिपटीने वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडूनही (एमएनजीएल) पुरवठाक्षमता वाढविण्यात आली आहे.पीएनजी’ जोडणी घेणे बंधनकारक केल्याने त्याचा परिणाम मागणीवर दिसून आला आहे. पूर्वी सोसायट्यांमध्ये सुविधा असूनही अनेकजण जोडणी घेण्यास टाळाटाळ करत होते. मात्र आता मोठ्या प्रमाणावर ग्राहक पुढे आले आहेत. त्यामुळे ‘पीएनजी’चा वापर वाढला असून गॅस वितरण व्यवस्था अधिक परिणामकारक झाली आहे.
अनेक सोसायट्यांमध्ये सुविधा उपलब्ध असूनही पूर्वी केवळ ५० टक्के रहिवासीच जोडणी घेत होते. आता मात्र हे प्रमाण ६० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. वाढती जागरूकता, सुरक्षिततेची खात्री आणि वापरातील सोय या कारणांमुळे नागरिक ‘पीएनजी’कडे वळत असल्याचे चित्र आहे. वाहिनीद्वारे पुरवठा होत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हा पर्याय अधिक विश्वासार्ह मानला जात आहे. शहरातील नव्या प्रकल्पांमध्ये तर ‘पीएनजी’ सुविधा बंधनकारक करण्यात येत असल्याने नवीन ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु