
नाशिक, 26 एप्रिल, (हिं.स.)। अंजनेरी येथील कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित लेट. जी. एन. सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक आणि कॉलेजमधील शिक्षक यांच्याशी सुसंवाद राहावा याकरिता सपकाळ नॉलेज हब येथे नुकतेच पालक-शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र सपकाळ यांनी भूषविले होते. त्यांनी उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, सध्याच्या स्पर्धे च्या युगात आपल्या पाल्याने टिकून राहावे याकरिता त्याच्याशी सुसंवाद असणे गरजेचे आहे. प्रथम वर्ष परीक्षेत प्रथम आलेले गुणवंत विद्यार्थी सानिया सातपुते, वैष्णवी आंधळे, राजनंदिनी वारे, पीयूष चौधरी, कुणाल पाटील, प्रणाली कोल्हे, महिमा आहेर आणि सायली पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. साहेबराव बागल यांनी या पालक शिक्षक मेळाव्याच्या आयोजनाबाबतची भूमिका स्पष्ट केली. पालकांच्या वतीने कृष्णा वारे, जयश्री पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रशासन अधिकारी डॉ. सचिन हारक, प्रथम वर्ष समन्वयक प्रा. संदीप बागूल, सर्व विभागप्रमुख शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV