
मुख्यमंत्री कार्यालयाच्या हस्तक्षेपानंतर प्रशासन सक्रिय
सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.) :मोहोळ तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांना शासकीय नियमानुसार पाच ब्रास वाळू मिळावी या मागणीला अखेर गती मिळाली असून, संबंधित प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने पावले उचलली गेली आहेत.
या विषयावर पंचायत समिती सदस्य व गटनेते संजीव खिलारे यांनी वारंवार पाठपुरावा करत महसूल प्रशासनाच्या टाळाटाळीविरोधात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. घरकूल लाभार्थ्यांना वाळू न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.
याच अनुषंगाने 28 एप्रिल रोजी मुख्यमंत्री बार्शी दौऱ्यावर येणार असल्याने, प्रतीकात्मक आंदोलन करत “उघडे” होऊन निवेदन देण्याचा इशाराही देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाने तत्काळ दखल घेत सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांना याप्रकरणी तातडीने लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या.
यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालकमंत्री गोरे यांची सोलापुरात भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात पंचायत समिती मोहोळचे गटनेते संजीव खिलारे, नगरपरिषदेचे गटनेते व भाजप तालुका अध्यक्ष सतीश काळे आणि उपसभापती राजकुमार पाटील उपस्थित होते.
घरकूल लाभार्थ्यांना नियमानुसार वाळू उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. प्रशासनाने याबाबत सकारात्मक पावले उचलल्याने लवकरच प्रश्न सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड