
छत्रपती संभाजीनगर, 28 एप्रिल (हिं.स.)। तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तिन्ही महान घटना वृक्षाच्या सावलीतच घडल्या. हीच निसर्गदत्त शिकवण जनमानसात रुजविण्यासाठी आणि ढासळत्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी यावर्षीची बुद्ध पौर्णिमा 'जागतिक बोधिवृक्ष दिन' म्हणून साजरी करण्याची संकल्पना 'बोधिवृक्ष माझ्या दारी: माझा प्राणवायू-माझी जबाबदारी' या अभियानाचे प्रमुख राजेश भोसले यांनी मांडली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून जागतिक मोहिमेची सुरवात होणार आहे.
मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र आणि भारतभर जनजागृती केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात नेपाळ, श्रीलंका, भूतान, म्यानमार, थायलंड आणि सिंगापूर यांसारख्या बौद्ध राष्ट्रांमध्ये 'जागतिक बोधिवृक्ष दिन' कृती समितीच्या माध्यमातून मोहीम विस्तारली जाणार आहे. केवळ मंदिरे किंवा विहारांतच नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या दारी बोधिवृक्षाची लागवड करावी, जेणेकरून मानवजातीला मुबलक प्राणवायू मिळेल, असा विश्वास राजेश भोसले यांनी व्यक्त केला. संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या धर्तीवर या दिनाचे आयोजन करून जागतिक स्तरावर पर्यावरणाची मोठी चळवळ उभी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
टीव्ही सेंटर येथील धम्मरत्न मित्रमंडळाच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त शुक्रवारी (ता. एक) पहाटे पाचला 'बुद्ध पहाट' हा विशेष कार्यक्रम राजमुद्रा चौकात होईल. गायक एस. के. जाधव हे युवा प्रबोधनकार शाहीर देवाभाऊ वानखेडे यांची बुद्ध-भीमगीते सादर करणार आहेत. उपासिकांनी पहाटे पाचला शुभ्रवस्त्र परिधान करून उपस्थित राहावे, असे आवाहन सचिव एकनाथ पाखरे, प्रवक्ते प्रा. विलास पांडे, उपाध्यक्ष मिलिंद दाभाडे, निमंत्रक रमेश वानखेडे, उत्तम जाधव, सुनील खरात, यशवंत दाभाडे, उत्तम तांबे, मुरलीधर गंगावणे आणि प्रकाश सोनवणे यांनी केले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis