
अमरावती, 29 एप्रिल (हिं.स.) : जिल्ह्यात यंदा उन्हाळी पिकांना शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून कृषी विभागाने नियोजित केलेल्या क्षेत्रापेक्षा दीडपट अधिक लागवड झाल्याची माहिती समोर आली आहे.
कृषी विभागाने यंदा सुमारे 8,054 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची लागवड होईल, असे नियोजन केले होते. मात्र प्रत्यक्षात तब्बल 13,576 हेक्टरवर पिकांची लागवड झाली असून ही सरासरी 168 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
हवामानातील बदलामुळे रब्बी हंगामाला काही प्रमाणात फटका बसल्याने त्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांकडे अधिक कल दाखवला असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
तालुकानिहाय विक्रमी पेरणी
अमरावती जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये अत्यंत उच्च प्रमाणात लागवड नोंदवली गेली आहे. अमरावती तालुक्यात 664 टक्के, नांदगाव खंडेश्वरमध्ये 308 टक्के तर मोर्शी तालुक्यात सर्वाधिक 878 टक्के उन्हाळी पिकांची लागवड झाली आहे. अनेक तालुक्यांमध्ये सरासरी 150 टक्क्यांहून अधिक पेरणी झाल्याचे आकडेवारीत दिसून आले आहे.
प्रमुख पिकांची स्थिती
जिल्ह्यात उन्हाळी हंगामात भुईमूग, तीळ, मूग, कांदा, मका, ज्वारी आणि भाजीपाला या पिकांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे.
मका : 1541 हेक्टर
तृण चारा : 512 हेक्टर
उन्हाळी ज्वारी : 634 हेक्टर
भुईमूग : 2368 हेक्टर
तीळ : 2516 हेक्टर
मूग : 2178 हेक्टर
कांदा : 1776 हेक्टर
भाजीपाला : 932 हेक्टर
विशेषतः तिळाच्या लागवडीने 2516 हेक्टरसह आघाडी घेतली आहे.
कृषी विभागाच्या मते, हा वाढलेला कल शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीच्या अपेक्षांशी जोडलेला असून आगामी काळात उत्पादनाची स्थिती हवामानावर अवलंबून असेल.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी