
परभणी, 29 एप्रिल, (हिं.स.)। तालुक्यातील नागरजवळा रोड शिवार परिसरात युवा शेतकरी नरेश वाल्मीक यांच्या शेतातील आखाड्यावर अचानक आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. वाढत्या तापमानामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या आगीत जनावरांचे खाद्य, भुस्याची वळई, बैलगाडी, ज्वारीचा कडबा, ज्वारी तसेच ठिबक सिंचनाचे साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेमुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मानवत नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे वाहन त्वरित दाखल होत चालक सय्यद कलीम, मुकेश कुमावत, राम दहे आणि संदीप जाधव यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग अधिक पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला. आग शेजारील शेतांमध्ये पसरली असती तर नुकसान अधिक वाढण्याची शक्यता होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे. मानवत अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis