
समुद्रपूरच्या शाळेत 118 उत्तरपत्रिकांवर एकसारखी उत्तरे
नागपूर, 29 एप्रिल (हिं.स.) : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे (स्टोट बोर्ड) फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत वर्धा जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपीची घटना घडली. याप्रकरणी बोर्डाने चौकशी समिती नेमली. परंतु, निकालाची तारीख जवळ येऊनही या चौकशी समितीने आपला अहवाल अद्याप दिलेला नाही. त्यामुळे बोर्डाची समिती नेमकी कसली आणि कोणती चौकशी करीत आहे.. ? तसेच या प्रकरणावर बोर्डाकडूनच माहिती का पुरवली जात नाही ? असे संशयकल्लोळ निर्माण करणारे प्रश्न उद्भवले आहेत.
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यामधील वासी (कोरा) इथल्या परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचा प्रकार घडला. विज्ञान शाखेच्या जीवशास्त्र विषयाच्या परीक्षेत तब्बल 118 विद्यार्थ्यांची उत्तरे तंतोतंत असल्याचे आढळून आले. यासंदर्भात व्हॅल्यूअर कडून (पेपर तपासणारे शिक्षक) माहिती मिळाल्यानंतर मॉडरेटर (उत्तरपत्रिकेचे पुनर्निरीक्षक) यांनी यासंदर्भात तत्काळ बोर्डाच्या नागपूर कार्यालयाला अहवाल पाठवला. मॉडरेटरकडून लेखी अहवालानंतर बोर्डाने याप्रकरणाची चौकशी सुरू केली. इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या सर्व 118 विद्यार्थ्यांची बोर्डाकडून उलटतपासणी घेण्यात आली. सामूहिक कॉपीचा हा प्रकार जेथे घडला ते परीक्षा केंद्र सामूहिक नक्कलीसाठी (मास कॉपी) कुख्यात आहे. सर्व प्रकरण एकदम स्पष्ट असूनही बोर्डाची चौकशी समिती अद्याप कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहचू शकलेली नाही. त्यामुळे महात्मा गांधी आणि विनोबा भावेंच्या वर्धा जिल्ह्यात शिक्षण व्यवस्था “हे राम” म्हणत असल्याचे चित्र आहे.
चौकशी अहावालानंतरच कारवाई
यासंदर्भात बोर्डातील देशमुख मॅडम यांना संपर्क केला असता, “वर्धा जिल्ह्यातील संबंधित परीक्षा केंद्रावर झालेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चौकशी समितीचा अहवाल प्रलंबित असल्यामुळे यासंदर्भात अधिक तपशील देता येणार नाही. अहवाल प्राप्त झाल्यावरच नियमानुसार उचित कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले”
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी