
- पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना प्रवेशबंदी; प्रवास होणार अधिक जलद व सुरक्षित
रायगड, 29 एप्रिल (हिं.स.)। मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करणारा बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अखेर पूर्णत्वास आला असून हा मार्ग १ मे २०२६ पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि वाहतूक पोलीस प्रशासनाने टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे यांनी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १ ते ३१ मे २०२६ या पहिल्या टप्प्यात केवळ हलकी मोटार वाहने (LMV), बस आणि प्रवासी वाहनांनाच या नवीन मार्गावरून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या कालावधीत सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. दुसऱ्या टप्प्यात, म्हणजे १ जून २०२६ नंतर, हलकी वाहने आणि बससाठी मार्ग सुरू राहणार असून मालवाहतूक वाहनांबाबत पुढील निर्णय सहा महिन्यांच्या निरीक्षणानंतर घेतला जाणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्बंध लागू केले आहेत. ज्वलनशील, स्फोटक किंवा धोकादायक वस्तू वाहून नेणाऱ्या ‘हॅझमॅट’ वाहनांना या बोगद्यांमधून प्रवेशास पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून अशा वाहनांनी जुन्या द्रुतगती मार्गाचाच वापर करणे बंधनकारक असेल.
वेगमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. बोगद्यांमध्ये हलक्या वाहनांसाठी ताशी १०० किलोमीटर, तर बस व इतर प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किलोमीटर इतकी कमाल वेगमर्यादा राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
‘मिसिंग लिंक’ मार्ग सुरू झाल्यामुळे घाटातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार असल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)