“आयसीसी वादानंतर बांगलादेशचा यू-टर्न, भारताला मालिका खेळण्याचे आमंत्रण”
ढाका, 09 एप्रिल (हिं.स.)बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की, बांगलादेश संघ भारताला भेट देण्यास इच्छुक असून, या वर्षाच्या अखेरीस बांगलादेशमध्ये द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी भारताला आमं
बांग्लादेश क्रिकेट बोर्ड लोगो


ढाका, 09 एप्रिल (हिं.स.)बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की, बांगलादेश संघ भारताला भेट देण्यास इच्छुक असून, या वर्षाच्या अखेरीस बांगलादेशमध्ये द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी भारताला आमंत्रित केले आहे. सध्याच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा भाग म्हणून भारत यावर्षी बांगलादेशचा दौरा करणार आहे, ज्यामुळे या घडामोडीचे महत्त्व आणखी वाढले आहे. यातून बांगलादेशातील नवीन प्रशासनाचा भारतासोबत संबंध प्रस्थापित करण्याचा आणि क्रिकेट संबंधांमधील अलीकडील तणावपूर्ण काळातून पुढे जाण्याचा प्रयत्न दिसून येतो. बांगलादेशने तमीम इक्बाल यांची देशाचे सर्वात तरुण क्रिकेट प्रमुख म्हणून नियुक्ती केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानचा आयपीएल करार रद्द केला होता. त्यानंतर बीसीबीने त्याला टी-२० विश्वचषकासाठी भारतात येण्यास परवानगी नाकारली. त्यानंतर आयसीसीने बांगलादेशला टी-२० विश्वचषकातून वगळून, बांगलादेशऐवजी स्कॉटलंडचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.आयसीसी आणि बीसीसीआयबरोबर झालेल्या संघर्षानंतर आपल्या क्रिकेटला होणाऱ्या संभाव्य नुकसानीची जाणीव बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आता झाली आहे. त्यामुळे, बोर्डाने बीसीसीआयला पत्र लिहून क्रिकेट संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

दुसरीकडे, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रमुख अमीनुल इस्लाम बुलबुल यांना सरकारने पदावरून हटवल्यानंतर त्यांनी आयसीसीकडे धाव घेतली आहे. अमीनुल इस्लाम बुलबुल हे त्यांच्या खेळाच्या दिवसांतील लढवय्या वृत्तीसाठी ओळखले जात होते. कसोटी शतक झळकावणारे ते पहिले बांग्लादेशी फलंदाज होते. वास्तविक पाहता, बांगलादेशच्या नवनिर्वाचित सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय क्रीडा परिषदेने बुलबुल यांच्या नेतृत्वाखालील बोर्ड बरखास्त करून त्या जागी ११ सदस्यीय अंतरिम समितीची स्थापना केली. नवीन निवडणुका होईपर्यंत ही समिती बोर्डाच्या कामकाजावर देखरेख ठेवेल. या तदर्थ समितीच्या प्रमुखपदी बांगलादेशचे माजी कर्णधार तमीम इक्बाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande