
नेपाळी पंतप्रधानांना देणार भारत दौऱ्याचे औपचारिक निमंत्रण
काठमांडू, 02 मे (हिं.स.)। भारताचे परराष्ट्र सचिव यांचा नेपाळ दौरा निश्चित झाला आहे. नेपाळचे परराष्ट्र सचिव अमृत बहादुर राई यांच्या निमंत्रणावर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचा दोन दिवसांचा नेपाळ दौरा ठरवण्यात आला आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मिस्री ११-१२ मे रोजी काठमांडूच्या दौऱ्यावर येणार आहेत.
नेपाळमध्ये बालेन्द्र शाह यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर भारताकडून होणारा हा पहिला राजनैतिक दौरा ठरणार आहे. परराष्ट्र मंत्रालयानुसार भारताचे परराष्ट्र सचिव ११ मे रोजी काठमांडू येथे पोहोचणार आहेत. यासाठी नेपाळचे परराष्ट्र सचिव अमृत बहादुर राई यांनी त्यांना औपचारिक निमंत्रण पाठवले आहे. आपल्या काठमांडू दौऱ्यादरम्यान ते परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल, अर्थमंत्री स्वर्णिम वागले, ऊर्जा मंत्री विराज भक्त श्रेष्ठ यांची भेट घेणार आहेत. याशिवाय सत्ताधारी पक्ष राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे अध्यक्ष रवि लामिछाने यांच्याशीही त्यांची भेट निश्चित झाली आहे.
मिस्री यांच्यासोबत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील नॉर्थ डेस्कचे प्रभारी अतिरिक्त सचिव मनु महावर हेही नेपाळमध्ये जाणार आहेत.
अलीकडेच दिल्ली दौऱ्यावर आलेल्या नेपाळच्या पत्रकारांच्या एका समूहाशी झालेल्या भेटीत परराष्ट्र सचिव मिस्री यांनी स्वतःही सांगितले होते की ते लवकरच नेपाळचा दौरा करणार आहेत. त्यांनी नेपाळमधील नव्या सरकारसोबत सर्व क्षेत्रांत सहकार्य सुरू ठेवण्याबाबतही भूमिका मांडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule