
नाशिक, 11 जून (हिं.स.)। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोट्यावधी रूपयांची विकासकामे सुरू आहेत. गोदावरी नदी पूर्णपणे प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी हेमंतदास महाराज यांनी केली. कुंभमेळ्यासाठी देशभरातून तसेच परदेशातून लाखो भाविक नाशिकमध्ये येणार असल्याने गोदावरीचे पावित्र्य आणि स्वच्छता जपणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
तपोवन साधूग्राम परिसरातील निर्मोही निर्वाणी आखाडा आणि दिगंबर आखाड्यासाठी प्रस्तावित जागांची पाहणी करण्यात आली. श्री ज्ञानदास महाराज यांचे शिष्य संजयदास महाराज, हेमंतदास महाराज आणि मुरलीदास महाराज यांनी रामकुंड परिसराला भेट देत घाटांची आणि विविध धार्मिक स्थळांची पाहणी केली. यावेळी संबंधित सुविधांचा आढावा घेऊन प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच फोटो हनुमान मंदिर परिसराचीही पाहणी करून मंदिर परिसरातील विकासकामे, स्वच्छता आणि संरक्षणाबाबत सूचना करण्यात आल्या. त्यांनी कुंभमेळ्यादरम्यान भाविकांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच धार्मिक परंपरा, संस्कृती आणि पवित्र स्थळांचे संवर्धन करण्यावर भर दिला.
महाराजांनी प्रशासनाकडे काही महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. कुंभमेळ्याच्या कालावधीत शहरातील मद्यविक्री व मांसाहार विक्रीची दुकाने बंद ठेवावीत, गोदावरी नदीत कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच रामकुंड परिसरातील आणि शहरातील पुरातन मंदिरांचे जतन व संवर्धन करावे, अशी मागणी त्यांनी केली. मंदिरांच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाला कोणतीही हानी पोहोचू नये यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV