
नाशिक, 11 जून (हिं.स.)। नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. अपक्ष गोकुळ गीते यांनी आपला प्रचार थांबवण्याचा आणि निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भूसे, गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत हा निर्णय स्पष्ट केला.
यावेळी गिरीश महाजन यांनी हा कोणताही राजकीय ड्रामा नसल्याचे सांगत, ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर गणेश गीते आणि गोकुळ गीते यांच्याशी अनेक फेऱ्यांत चर्चा करण्यात आल्या आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उदय सामंत आणि दादा भुसे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सकारात्मक निर्णय झाला. गीते यांची कोणतीही वैयक्तिक मागणी नव्हती, मात्र ते वजनदार नेते असल्याने त्यांच्या राजकीय भवितव्याचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. म्हाडा प्रकरणाशी किंवा कोणत्याही नोटिशीशी या निर्णयाचा संबंध नसल्याचे सांगत महाजन यांनी गीते यांनी दबावाखाली माघार घेतलेली नसल्याचे ठामपणे नमूद केले. उमेदवारीबाबत काही नाराजी होती, ती चर्चेतून दूर झाली असून आता महायुतीच्या उमेदवाराला सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. गीते हे पक्षात नसले तरी महायुतीच्या परिवाराचा भाग असल्याचेही त्यांनी सांगितले.
गणेश गीते यांनी सांिगतले की, कुटुंबात फूट पडू नये म्हणून गोकुळ गीते यांना माघारीचा सल्ला दिल्याचे सांगितले. राजकारणामुळे नातेसंबंध बिघडू नयेत, हीच भूमिका कुटुंबाची होती. गोकुळ गीते यांनी त्यानुसार निर्णय घेतला असून आता ते स्वतंत्रपणे राजकीय वाटचाल करतील. महायुतीची सर्व मते एकत्र राहतील आणि आता महायुतीचा एकच उमेदवार मैदानात असल्याने कार्यकर्ते एकदिलाने काम करतील, असा विश्वास गीते यांनी व्यक्त केला. गोकुळ गीते हे पुढील काळात महायुतीच्या प्रचारात सक्रिय सहभागी होतील, असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी आ. सुहास कांदे, उपमहापौर विलास शिंदे, अजय बोरस्ते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपिस्थत होते.
कोट
गोकुळ गीते यांचा महायुतीला शंभर टक्के पाठिंबा असून या निर्णयामुळे महायुतीच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे, . सोशल मीडियावर काही व्यक्तींकडून जाणीवपूर्वक पोस्ट टाकल्या जात असल्याचे निदर्शनास आले असून त्याबाबत नरेंद्र दराडे यांना पोलिस आयुक्तांकडे पत्र देण्यास सांिगतले . गोकुळ गीते यांचे योगदान वाया जाऊ दिले जाणार नाही. झालेला निर्णय हा महायुतीच्या हिताचा आणि महायुतीला पोषक आहे. संबंधित व्यक्ती महामंडळावर कार्यरत होत्या आणि या विषयावर शिंदे साहेबांनीही चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले. गीते यांच्याशी असलेले संबंध कायम राहावेत यासाठी प्रयत्न केले असून ते महायुतीसोबतच राहतील. माझ्या आयुष्यात गीते हे पूर्वी मित्र नव्हते, मात्र या प्रक्रियेत मला नवे मित्र मिळाले, मंत्री उदय सामंत
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV