
उच्चस्तरीय बैठक : कुंभमेळ्यानंतर नवीन पर्यायावर विचार
नाशिक, 11 जून, (हिं.स.)। नाशिककरांचे स्वप्न असलेला मेट्रो प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. निओ मेट्रो प्रकल्प रद्द झाल्यानंतर जवळपास वर्षभराने राज्य सरकारने नाशिकसाठी पुन्हा एकदा नवीन आणि योग्य सार्वजनिक वाहतूक प्रणाली शोधण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबईत नुकत्याच झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुंबईत उच्चस्तरीय बैठक नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत ही बैठक झाली. यात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त अमित रंजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत तैवानमधील लाईट रेल सिस्टिम, मोनोरेल, नियमित मेट्रो आणि जुन्या टायर-आधारित निओ मेट्रोच्या सुधारित आवृत्तीबाबत चर्चा करण्यात आली. कम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन मेट्रोचा अंतिम निर्णय महामेट्रोद्वारे तयार करण्यात येणा-या कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन' वर अवलंबून असेल. हा अहवाल पुढील एका महिन्यात पूर्ण अपेक्षित असून, यात शहरातील वाहतुकीचे स्वरूप आणि वाढती लोकसंख्या यांचा अभ्यास केला जाईल. २०१७ चा जुना सर्व्हे कालबाह्यः जुना निओ मेट्रो प्रकल्प २०१७च्या सर्वेक्षणावर आधारित होता. मात्र, गेल्या ८ वर्षांत नाशिक विमानतळाचे कार्यान्वयन आणि
शहराचा झालेला विस्तार यामुळे वाहतुकीची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळेच आता नव्याने अभ्यास केला जात आहे. जागतिक मॉडेल्सचा अभ्यासः महामेट्रोने अबू धाबी, तैवान आणि युरोपीय देशांमधील सार्वजनिक वाहतूक प्रणालींचा अभ्यास केला असून, नाशिकसाठी काय फायदेशीर ठरेल, याची चाचपणी केली जात आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, गेल्या वर्षी कुंभमेळ्याच्या तयारीच्या बैठकीत पंतप्रधान कार्यालयाचे सल्लागार तरुण कपूर यांनी निओ मेट्रोऐवजी जागतिक स्तरावरील इतर पर्यायांचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, नियोजित प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी पाहता, २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नवीन मेट्रो प्रकल्प मार्गी लागणे कठीण असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नाशिकची वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहतूक कोंडी पाहता, शहराला शाश्वत सार्वजनिक वाहतूक प्रणालीची गरज आहे. नवीन मोबिलिटी प्लॅन नाशिकच्या मेट्रो प्रकल्पाची दिशा ठरवण्यासाठी निर्णायक ठरेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV