
कोल्हापूर, 12 जून (हिं.स.)।कोल्हापूरातील पुरातन आणि संपूर्ण देशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराला सोन्याचा कळस बसवण्यात आला. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी तब्ब्ल अडीच कोटी रुपयाचे दान या कळसासाठी देऊन त्यांनीच हा कळस आणि त्याखालील डेरा बनवून घेतला अधिक मासाचे औचित्य साधून गुरुवारी मध्यरात्री पासून सकाळी सूर्योदया पर्यंत हा सोन्याचा कळस बसवण्यात आला.
एक भक्त म्हणून गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराला सोन्याचा कळस बसवण्याचा मानस व्यक्त केला आणि अवघ्या दोन महिन्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीसह सर्व संबंधित विभागाची रीतसर परवानगी घेऊन हा कळस बनवून घेतला. मूळ 400 किलोचा कळस आणि डेरा, त्यावर अडीच किलोचा सोन्याचा पत्रा लावून हा कळस बनवण्यात आला आहे.
काल गुरुवारी रात्री कळस आणि इतर साहित्य मंदिर आवारात आणण्यात आले. बाहेरून आणलेले 10 आणि स्थानिक 15 कर्मचारी, क्रेन यांच्या साहाय्याने देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, आणि सहकारी यांच्या निगराणीखाली कळस बसवण्याचे काम मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास सुरु झाले. सकाळी 7. 30 वाजेपर्यंत कळस बसवण्याचे काम पूर्ण झाले. सध्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्या नुसार कामे सुरु असल्याने कलशारोहणाचा कोणताही सोहळा किंवा धार्मिक विधी न करता कळस बसवण्याचे काम पूर्ण केले असून सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर विधिवत सोहळा केला जाईल असे सचिव शिवराज नायकवडी यांनी सांगितले. कळस देणाऱ्या गोव्याच्या राणे कुटुंबातील कोणीही यावेळी उपस्थित नव्हते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar