
अमरावती, 15 जून (हिं.स.) :
अमरावती-परतवाडा राज्य महामार्गावरील शेकडो वृक्षांना जाणीवपूर्वक आग लावून त्यांचा नाश करण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप वृक्षप्रेमींकडून करण्यात आला आहे. वृक्षतोडीला उच्च न्यायालयाचा स्थगनादेश असल्याने काही घटकांकडून वृक्षांच्या बुंध्यांना आग लावून त्यांना जमीनदोस्त करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.आसेगाव आष्टी परिसरासह महामार्गाच्या विविध भागांत अशा प्रकारची अनेक झाडे दिसून येत आहेत. या मार्गावर कडुनिंब, चिंच, बाभूळ यांसारख्या मौल्यवान प्रजातींची शेकडो वृक्षे वर्षानुवर्षे उभी आहेत. रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे वृक्षतोड होणार असल्याच्या भीतीने पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने वृक्षतोडीवर स्थगनादेश दिला असून त्यामुळे अनेक वृक्ष वाचले आहेत.दरम्यान, सहा किलोमीटरच्या रस्ता बांधकामासाठी वन विभागाने पूर्वी वृक्षतोडीस परवानगी दिली होती. त्यानुसार काही वृक्षांची तोडही करण्यात आली. मात्र पर्यावरणप्रेमींच्या आक्षेपानंतर ही प्रक्रिया थांबविण्यात आली. आजही तोडलेली झाडे रस्त्याच्या कडेला पडून असल्याचे दिसते.वृक्षप्रेमींच्या मते, कायदेशीररित्या वृक्षतोड शक्य नसल्याने काही ठिकाणी वृक्षांच्या बुंध्यांना आग लावून त्यांना हळूहळू नष्ट केले जात आहे. मागील सहा महिन्यांत सुमारे १०० ते २०० वृक्ष जाळून नष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणात महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप करण्यात येत आहे. संबंधित विभागांनी तातडीने घटनास्थळांची पाहणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच उर्वरित वृक्षांचे संरक्षण करावे, अशी मागणी वृक्षप्रेमी व पर्यावरण कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी