नीट-यूजी परीक्षेदरम्यान वाहतूक सुरळीत राहावी म्हणून पंतप्रधान मोदी विमानतळावरच थांबले
नवी दिल्ली , 21 जून (हिं.स.)। दिल्ली विमानतळावर आज (२१ जून) दुपारी १.१५ वाजता पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ आपल्या निवासस्थानाकडे रवाना होण्याऐवजी विमानतळावरच थांबण्याचा निर्णय घेतला. दुपारी २ वाजता नीट-यूजी परीक्षेला सुरुवात ह
नीट-यूजी परीक्षेदरम्यान वाहतूक सुरळीत राहावी म्हणून  पंतप्रधान मोदी विमानतळावरच थांबले


नवी दिल्ली , 21 जून (हिं.स.)। दिल्ली विमानतळावर आज (२१ जून) दुपारी १.१५ वाजता पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ आपल्या निवासस्थानाकडे रवाना होण्याऐवजी विमानतळावरच थांबण्याचा निर्णय घेतला. दुपारी २ वाजता नीट-यूजी परीक्षेला सुरुवात होणार होती. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचताना कोणतीही अडचण येऊ नये आणि वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी पंतप्रधानांनी परीक्षा सुरू झाल्यानंतरच आपल्या निवासस्थानाकडे प्रस्थान केले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महत्त्वाच्या वेळेत दिल्लीतील वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, विशेषतः मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा केंद्रांकडे जात असताना त्यांना त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधानांच्या ताफ्याच्या हालचालींसाठी नेहमी ठरावीक मार्गांवर वाहतूक व्यवस्थापन आणि तात्पुरत्या निर्बंधांची आवश्यकता भासते. त्यामुळे विद्यार्थ्यांवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष काळजी घेतली.

या वर्षीच्या नीट-यूजी परीक्षेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण यापूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणामुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे यावेळी देशभरात कडक सुरक्षा व्यवस्थेत नीट-यूजीची पुनर्परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

देशातील सुमारे ५,४४० परीक्षा केंद्रांवर आणि परदेशातील १४ केंद्रांवर ही परीक्षा होत असून, २२ लाखांहून अधिक उमेदवार त्यामध्ये सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) ने परीक्षेसाठी व्यापक आणि कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande