
* नाशिक, संभाजीनगरकडे राज्याचे लक्ष
मुंबई, २१ जून (हिं.स.) : राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 पैकी 6 जागांवर महायुतीने मतदानापूर्वीच बिनविरोध विजय मिळवला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष उर्वरित 11 जागांच्या निकालाकडे लागले आहे. या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी उद्या (सोमवार, २२ जून) होणार आहे.
या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. अमरावती मतदारसंघात काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. पक्षाने आपल्या सदस्यांना मतदानात तटस्थ राहण्याचा 'व्हिप' (पक्षादेश) बजावला होता, मात्र काँग्रेस नगरसेवकांनी तो धुडकावून लावत मतदानात भाग घेतला. दुसरीकडे, नाशिक आणि भंडारा-गोंदिया या मतदारसंघांमध्ये मतदारांनी 100 टक्के मतदानाचा हक्क बजावला.
छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी (98.90%) मतदान केले. येथे महायुतीचे सुहास शिरसाठ, महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे आणि अपक्ष उमेदवार इसाक खान सांडू खान यांच्यात तिरंगी लढत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील मतमोजणी केंद्राची पाहणी करून पूर्वतयारीचा आढावा घेतला. मतमोजणीसाठी 4 टेबल लावण्यात आले असून 54 अधिकारी-कर्मचारी तैनात आहेत.
बिनविरोध विजयी उमेदवार
वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर : अरुण लखाणी, भाजप
पुणे: विक्रम काकडे , राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे :रवींद्र फाटक , शिवसेना रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी, शिवसेना अहिल्यानगर: प्राजक्त तनपुरे, भाजप
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी