
नवी दिल्ली, 29 जून (हिं.स.)। ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या सहा जवानांची नावे १३ महिन्यांनंतर जाहीर केल्याबद्दल काँग्रेस पक्षाने सरकार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या माजी सैनिक विभागाचे अध्यक्ष, कर्नल रोहित चौधरी (निवृत्त) यांनी आरोप केला की, संरक्षण मंत्र्यांनी सभागृहात खोटी माहिती दिली आणि शहीदांकडे दुर्लक्ष केले.
दिल्ली येथील पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कर्नल रोहित चौधरी यांनी आरोप केला की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितले होते की ऑपरेशन सिंदूरमध्ये एकही जवान शहीद झाला नाही, परंतु सरकारने नंतर शहीदांची नावे जाहीर केली. शहीदांची नावे जाहीर करण्यास झालेला १३ महिन्यांचा विलंब हा राष्ट्रीय सुरक्षेशी केलेली तडजोड आहे. त्यांनी संरक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि त्यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करणार असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, सरकार आणि सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी माफी मागावी.
त्यांनी असा आरोप केला की, सरकारने ऑपरेशन दरम्यान लष्कराला पूर्ण मोकळीक दिली नाही आणि त्याचे परराष्ट्र धोरण कमकुवत होते, ज्यामुळे पाकिस्तानला जागतिक संस्थांकडून कर्ज मिळाले आणि दहशतवादी संघटनांवर पाळत ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी अग्निवीर योजना रद्द करण्याची मागणीही केली.
केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या सहा सैनिकांच्या नावांचा राष्ट्रीय युद्ध स्मारकातील 'रोल ऑफ ऑनर'मध्ये समावेश केला आहे. ही नावे आता स्मारकाच्या मुख्य भिंतीवर, 'त्याग चक्र'वर कायमस्वरूपी कोरली जातील. २६ जून रोजी ऑपरेशन सिंदूर दरम्यान कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या या सहा सैनिकांची नावे नवी दिल्लीतील स्मारकाच्या भिंतीवर कोरण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule