
- विदर्भात पावसाची 18 टक्के तूट
मुंबई, 11 जुलै (हिं.स.)।जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात दमदार पुनरागमन करत अनेक जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढले. या जोरदार पावसामुळे जून महिन्यातील पावसाची तूट मोठ्या प्रमाणात भरून निघाली असून अनेक भागांवरील जलसंकटाचे सावट काहीसे दूर झाले होते. मात्र, आता पुन्हा एकदा मान्सूनच्या वाटचालीबाबत चिंता वाढली आहे. प्रशांत महासागरात सक्रिय होत असलेल्या अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनच्या प्रवाहावर परिणाम होण्याची शक्यता असून पावसाचा वेग मंदावला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 15 जुलैपर्यंत उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतासह महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी भागात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र तसेच उत्तर भारतात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता कमकुवत झाल्याने ढगांची निर्मिती कमी झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाऐवजी उन्हाचा चटका जाणवण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती 19 जुलैपर्यंत कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबई आणि कोकण परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता असली तरी उर्वरित महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सून एकसारखा न बरसता टप्प्याटप्प्याने सक्रिय होत आहे. काही दिवस अतिवृष्टी झाल्यानंतर पुन्हा अनेक दिवस कोरडे वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनचा दुसरा सक्रिय टप्पा सुरू होण्याची शक्यता असून तोपर्यंत शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान, मुंबईत जुलैच्या पहिल्या पाच दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे महिन्याची सरासरी ओलांडली आहे. सांताक्रुज हवामान केंद्रात 899.2 मिमी पावसाची नोंद झाली असून तो सरासरीपेक्षा 5.1 टक्के अधिक आहे. तर कुलाबा केंद्रात 823.4 मिमी पाऊस नोंदवण्यात आला असून तो सरासरीपेक्षा 12.2 टक्के अधिक आहे.
दुसरीकडे विदर्भात मात्र पावसाची चिंता कायम आहे. 1 जून ते 10 जुलैदरम्यान विदर्भात सरासरीच्या तुलनेत 18 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात या कालावधीत 237.2 मिमी पाऊस झाला असून सरासरी 263.9 मिमी आहे. त्यामुळे येथे 10 टक्के पावसाची कमतरता आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक 46 टक्के तूट नोंदवण्यात आली आहे. पावसाने पुढील काही दिवसांत समाधानकारक हजेरी न लावल्यास खरीप पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आता पुन्हा एकदा आकाशाकडे लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule