आषाढी वारीचा भक्तिमय सोहळा आता घरबसल्या
मुंबई, 24 जुलै (हिं.स.)। आषाढी वारी म्हणजे विठ्ठलभक्ती, नामस्मरण आणि अध्यात्माचा अखंड उत्सव. लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलनामाचा गजर करत मार्गक्रमण करतात. या भक्तिमय वातावरणाचा आनंद प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी झी टॉकीजने खास आषाढी सो
Zee


मुंबई, 24 जुलै (हिं.स.)।

आषाढी वारी म्हणजे विठ्ठलभक्ती, नामस्मरण आणि अध्यात्माचा अखंड उत्सव. लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलनामाचा गजर करत मार्गक्रमण करतात. या भक्तिमय वातावरणाचा आनंद प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी झी टॉकीजने खास आषाढी सोहळ्याचे आयोजन केले असून, त्याअंतर्गत ‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ हा विशेष कार्यक्रम दररोज सकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प. प्रकाश साठे महाराज आणि अनुराधा ताई यांच्या प्रभावी कीर्तनातून संतवाङ्मय, वारकरी संप्रदायाची परंपरा, विठ्ठलभक्ती आणि जीवनाला सकारात्मक दिशा देणारे विचार प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत. ओघवती वाणी, अभ्यासपूर्ण निरूपण आणि भक्तिरसाने भारावलेले वातावरण यामुळे प्रत्येक भाग हा अध्यात्माचा आनंद देणारा ठरणार आहे.

आषाढी वारीचा आनंद प्रत्येकापर्यंत पोहोचावा या हेतूने झी टॉकीजतर्फे ‘भेटी लागे जीवा’ हा विशेष कार्यक्रम वृद्धाश्रमात आयोजित करण्यात आला आहे. भक्ती, कीर्तन आणि आपुलकीचा सुंदर संगम घडवणाऱ्या या उपक्रमातून ज्येष्ठ नागरिकांसोबत विठ्ठलभक्तीचा आनंद साजरा करण्यात येणार असून, आषाढी वारीचा भावस्पर्शी अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक हृदयस्पर्शी प्रयत्न आहे.

आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या परंपरेतील कीर्तनाची समृद्ध परंपरा जपत झी टॉकीजने भक्ती, संस्कार आणि अध्यात्म यांचा संगम घडवणारा हा विशेष कार्यक्रम प्रेक्षकांसाठी सादर केला आहे. घरातील सर्व पिढ्यांनी एकत्र बसून अनुभवावा असा हा भक्तिमय सोहळा प्रत्येकाच्या मनाला समाधान आणि सकारात्मक ऊर्जा देणारा ठरेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande