
नवी दिल्ली, 04 जुलै (हिं.स.) : अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी निष्पक्ष चौकशी करावी. तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अलोक कुमार यांनी केली आहे.
यासंदर्भात हिंदुस्थान समाचारशी संवाद साधताना आलोक कुमार म्हणाले की, या घटनेमुळे संपूर्ण हिंदू समाजाला मोठा धक्का बसला असून, विहिपने सुरुवातीपासूनच निष्पक्ष चौकशी आणि दोषींविरुद्ध कठोर कारवाईची भूमिका घेतली आहे.घटनेची माहिती मिळताच एफआयआर दाखल करणे, अनुभवी अधिकाऱ्यांकडून चौकशी करून घेणे तसेच प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात करण्याची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सत्य लवकरात लवकर समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना आलोक कुमार यांनी स्पष्ट केले की, विहिप कोणत्याही व्यक्तीला संरक्षण देण्याच्या भूमिकेत नाही. ज्यांच्यावर आरोप झाले आहेत, त्या सर्वांची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि कोणीही दखलपात्र गुन्हा केला असल्यास त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.मंदिराच्या व्यवस्थेबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सक्षम प्रशासकीय आणि तांत्रिक व्यवस्था उभारण्याची गरज व्यक्त केली.
मंदिराचे व्यवस्थापन श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाकडे असल्याचे नमूद करत त्यांनी आधुनिक सुरक्षा व्यवस्था, पारदर्शक कार्यपद्धती आणि अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती यांसारखी पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले, जेणेकरून भाविकांनी अर्पण केलेला प्रत्येक रुपया सुरक्षित राहील.
चंपत राय यांच्या कथित विधानांबाबत आणि त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत विहिपने संयमित भूमिका घेतली आहे. केवळ माध्यमांतील वृत्तांच्या आधारे निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे सांगत, चौकशी पूर्ण होण्यापूर्वी कोणावरही संघटनात्मक कारवाई करणे घाईचे ठरेल, असे विहिपने म्हटले. मात्र, चौकशीत कोणाचीही निष्काळजीपणा किंवा गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला कोणतीही माफी दिली जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी पुन्हा स्पष्ट केली.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यास बरखास्त करण्याच्या मागणीवर बोलताना विहिपने सांगितले की, काही व्यक्तींवरील आरोपांच्या आधारे संपूर्ण न्यास बरखास्त करणे योग्य ठरणार नाही. न्यासातील इतर विश्वस्त हे प्रतिष्ठित संत आणि समाजातील मान्यवर व्यक्ती आहेत, असे संघटनेचे मत आहे.करोडो रामभक्तांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी चौकशी पूर्ण पारदर्शकतेने व्हावी, दोषींना कठोर शिक्षा मिळावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी अभेद्य व्यवस्था उभारली जावी, असे आवाहन आलोक कुमार यांनी केले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी