
नाशिक, 19 ऑगस्ट (हिं.स.)। श्रावण मासानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत भाविकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन, कुंभमेळा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार गोकुळ गिते, प्रा. देवयानी फरांदे यांच्यासह आदी उपस्थित होते.
पालकमंत्री महाजन यांनी सांगितले की, श्रावण सोमवार निमित्त भाविक ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा घालतात. या पार्श्वभूमीवर या मार्गावर आरोग्य पथके नियुक्त करावेत. स्वच्छता गृह, शौचालयांची व्यवस्था करावी, ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत. गंगाद्वार येथे रुग्ण वाहिका, आरोग्य पथक राहील याची दक्षता घ्यावी. वाहनतळांच्या ठिकाणी वीज, पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्य पथके उपलब्ध करून द्यावीत. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर शहरात दैनदिन स्वच्छतेला प्राधान्य द्यावे.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, श्रावण माहिन्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. सर्व विभाग एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पहिल्या सोमवारी गर्दीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. तसेच श्रावण महिना संपेपर्यंत त्र्यंबकेश्वर शहरातील जुने रूग्णालयही सुरू ठेवण्यात येणार आहे.
तहसीलदार गणेश जाधव यांनी सांगितले की,तालुका प्रशासनाच्या वतीने विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पाच हजार भाविकांच्या क्षमतेचा मंडप घालण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार श्रीमती अहिरे, नगराध्यक्षा श्रीमती तुंगार यांनीही विविध सूचना केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI