मतदार यादीतील दुबार, मृत नावे वगळण्याचे काम; विरोधासाठी विरोध नको : मेघना बोर्डीकर
Work to remove duplicate and dead names from voter list; No need for opposition for opposition's sake: Meghna Bordikar
Work to remove duplicate


नाशिक, 19 ऑगस्ट (हिं.स.)।

मतदार यादीतून सुमारे एक कोटी नावे वगळल्याच्या आरोपावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, दुबार तसेच मृत व्यक्तींची नावे वगळण्यासाठी मतदार यादीची दुरुस्ती केली जात आहे. यामागे कोणताही अन्य हेतू नाही, असे स्पष्टीकरण महाराष्ट्राच्या राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

नाशिक येथील स्वामीनारायण मंदिरात उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या एसआयआर (विशेष सखोल पुनरिक्षण) बैठकीसाठी त्या उपस्थित होत्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.

बोर्डीकर म्हणाल्या की, मतदार यादीमध्ये अनेकदा दुबार नावे असतात, तर काही मतदारांचा मृत्यू झालेला असतो. त्यामुळे मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी दुरुस्तीची प्रक्रिया राबविली जात आहे. यापूर्वी अशा प्रकारे मतदार यादीची दुरुस्ती झालेली नव्हती. त्यामुळे आता ही प्रक्रिया योग्य पद्धतीने केली जात असून, त्याकडे अन्य कोणत्याही दृष्टिकोनातून पाहण्याची गरज नाही.

नाशिकमधील भाजपच्या बैठकीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, निवडणुका असोत किंवा नसोत, भाजप हा २४ तास काम करणारा पक्ष आहे. केंद्रीय नेतृत्वाने मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीत संघटनात्मक कामासोबतच घटनात्मक बाबींवरही चर्चा करण्यात आली.

पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करताना बोर्डीकर म्हणाल्या की, अशा घटना अत्यंत दुर्दैवी, चीड आणणाऱ्या आणि खेदजनक आहेत. समाजात राक्षसी प्रवृत्तीचे लोक असल्यामुळे अशा घटना घडतात. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या तीन तासांत आरोपीला पकडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला व मुलींवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट केले असून, आरोपीवर कठोर कारवाई करून प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविले जाईल, असे त्यांनी सांगितले.

मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी २५ लाख रुपयांच्या खर्चाबाबत विचारले असता, महापौरांकडून जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या नवीन उपाययोजना व उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया प्रसिद्धी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

परभणीच्या विकासाबाबत बोलताना बोर्डीकर यांनी मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावले उचलल्याचे सांगितले. परभणीचा आकांक्षित जिल्ह्यांमध्ये समावेश असून, उद्योग व गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परभणीच्या इतिहासात पहिल्यांदाच १,६०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्कायमेटच्या दुष्काळ आणि पीक नुकसानीच्या अंदाजाबाबत त्या म्हणाल्या की, यंदाची परिस्थिती कशी असेल याचा अंदाज सुरुवातीपासून व्यक्त करण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande