
पुणे, 19 ऑगस्ट (हिं.स.)।
मुलींचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) पात्र मुलींची खाती उघडून पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे उपआयुक्त जे. बी. गिरासे यांनी केले. पुणे विभागात आतापर्यंत सुमारे ८ लाख मुलींची सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाती उघडण्यात आली असून, त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. दहा वर्षांखालील मुलींच्या नावाने पालक किंवा कायदेशीर पालकांना हे खाते उघडता येते. या खात्यात दरवर्षी किमान २५० रुपये ते कमाल १ लाख ५० हजार रुपये जमा करता येतात. सध्या या योजनेवर वार्षिक ८.२ टक्के व्याजदर लागू आहे. खाते उघडल्यापासून २१ वर्षांनी योजनेची परिपक्वता होते. मुलीच्या उच्च शिक्षणासाठी नियमानुसार खात्यातील ५० टक्के रक्कम काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे पालकांनी मुलीच्या भविष्यातील शिक्षण व आर्थिक गरजा लक्षात घेऊन या योजनेत गुंतवणूक करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. योजनेचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या आणि शालेय शिक्षकांच्या माध्यमातून पात्र मुलींची १०० टक्के नोंदणी करण्याचे उद्दिष्ट टपाल विभागाने ठेवले आहे. योजनेची अधिक माहिती घेण्यासाठी पालकांनी टपाल कार्यालयातील अधीक्षक समीर महाजन (८४४८३२९८४४), नितीन येवला (८८३०७०५५४१), दिलीप सर्जेराव (९७६६०७७९९६), केतन शित्रे, बारामती (९२७०५३२३९४) आणि अविनाश पाखरे (८७८८३२३२१८) यांच्याशी संपर्क साधावा, असेही श्री. गिरासे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु