
रत्नागिरी, 23 ऑगस्ट (हिं.स.) । खवळलेला समुद्र आणि तांत्रिक बिघाडामुळे मासेमारी नौका भरकटून रत्नागिरी शहरानजीकच्या कुर्ली समुद्रकिनारी धडकल्याची घटना काल, दि. २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली.
‘अल रिझवान’ नावाची नौका अचानक अनियंत्रित झाल्याने ती किनाऱ्याच्या दिशेने भरकटत गेली. सुदैवाने नौका कुर्ली किनाऱ्याला लागल्याने मोठा अनर्थ टळला.
समुद्रात वाऱ्याचा वेग वाढलेला असताना नौकेचे इंजिन अचानक निकामी झाले. त्यामुळे नौकेवरील नियंत्रण सुटले आणि ती वाऱ्याच्या प्रवाहासोबत किनाऱ्याच्या दिशेने वाहत गेली. अखेर नौका कुर्ली किनाऱ्यावर येऊन धडकली.
किनाऱ्याला आदळल्याने नौकेचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र प्रसंगावधान राखल्याने नौकेवरील सातही खलाशी सुखरूप असल्याची माहिती आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
समुद्रातील बदलते हवामान आणि नौकांमधील तांत्रिक बाबींच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने काही मच्छीमारांनी मासेमारी तात्पुरती थांबवली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी