
रत्नागिरी, 23 ऑगस्ट (हिं.स.) । लांजा तालुक्यात भांबेड येथे १९८१ मध्ये स्थापन झालेल्या नवयुग उत्कर्ष युवक मंडळातर्फे पत्रकार जगदीश कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ खुल्या जिल्हास्तरीय लेख लेखन स्पर्धेचे सलग तिसऱ्या वर्षी आयोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या स्पर्धेसाठी तीन समकालीन व अभ्यासपूर्ण विषय देण्यात आले आहेत. ‘शिवरायांचे स्वराज्य आणि आजची युवा पिढी’, ‘कोकणातील तरुणांचे वाढते स्थलांतर’ तसेच ‘फेक न्यूज आणि सोशल मीडिया : सत्य, समाज आणि पत्रकारितेपुढील आव्हाने’ हे विषय स्पर्धकांसाठी खुले आहेत. विजेत्यांना अनुक्रमे १,५०० रुपये, १,००० रुपये आणि ७५० रुपयांचे बक्षीस, चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक असून त्यासाठी आधार कार्डचा पुरावा सादर करावा लागेल. लेख केवळ मराठी भाषेत असावा आणि त्याची शब्दमर्यादा किमान १,००० ते कमाल १,५०० शब्द अशी आहे. प्रत्येक स्पर्धकाला केवळ एकच लेख पाठविता येईल. लेख हस्तलिखित किंवा संगणकीय टाइप केलेला असावा. लेख पूर्णपणे स्वनिर्मित व अप्रकाशित असणे आवश्यक आहे. लेखाच्या मुख्य पानावर स्पर्धकाचे नाव लिहू नये. स्वतंत्र कागदावर स्पर्धकाचे संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व आधार कार्डची छायाप्रत (PDF) जोडावी. लेख कोणत्याही जाती, धर्म, राजकीय पक्ष किंवा व्यक्तीविरुद्ध आक्षेपार्ह अथवा वैयक्तिक टिप्पणी करणारा नसावा.
स्पर्धकांनी आपले लेख १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत navyugutkarshyuvakmandal@gmail.com या ई-मेलवर किंवा ९३७३५०५७७३ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावेत. स्पर्धेत प्राप्त झालेल्या उत्कृष्ट लेखांचे भविष्यात मासिक किंवा स्मरणिकेत प्रकाशन करण्याचे हक्क आयोजकांकडे राखीव राहतील. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी ऋषिकेश बेर्डे (९३७३५०५७७३) किंवा चिन्मय भिंगार्डे (८००७४३४९९८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नवयुग उत्कर्ष युवक मंडळाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी