
चंद्रपूर, 27 ऑगस्ट (हिं.स.)। दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचविणे आवश्यक आहे. याशिवाय जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे बांधकाम त्वरीत पूर्ण होण्यासाठी गांभिर्याने लक्ष द्यावे, अशा सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्हास्तरीय व्यवस्थापन संघाच्या बैठकीत त्या बोलत होत्या. पुढे जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या बांधकामाचा कार्यादेश मिळाल्यानंतर ते काम एका वर्षात पूर्ण करणे आवश्यक आहे. कामाची गती वाढवून केंद्राचे बांधकाम डिसेंबर अखेर पर्यंत पूर्ण होईल, याबाबत नियोजन करावे. पुनवर्ससन केंद्रासोबतच तेथे आवश्यक मनुष्यबळासाठी आतापासून पाठपुरावा करावा.
जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी युडीआयडी कार्ड महत्त्वाचे आहे. त्याबाबतची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. एकही पात्र दिव्यांग व्यक्ती युडीआयडी कार्ड अभावी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, त्यासाठी आवश्यक सर्व्हेक्षण करावे, अशा सुचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी लहान मुलांमधील दिव्यांगत्वाचा प्रतिबंध, लवकर निदान आणि त्वरीत उपाययोजना या विषयी जनजागृती करणे, शिबिरांमार्फत गरजवंतांचे मुल्यांकन करणे, कृत्रीम अवयव, श्रवणयंत्रे आणि इतर सहायक उपकरणे प्रदान करणे, दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना मानसिक समुपदेशन करणे, शस्त्रक्रियेद्वारे वैद्यकीय संदर्भ सेवा देणे तसेच उपजिविका व एकीकरण याबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, अतिरिक्त् शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सहायक आयक्त भागवत रेजीवाड, तहसीलदार सीमा गजभिये, डॉ. मंगेश गुलवाडे, दिव्यांग प्रतिनिधी निलेश पाझारे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव