
सोलापूर, 30 ऑगस्ट (हिं.स.)।
आगामी सणासुदीत साखरेच्या दरात पुन्हा वाढ होऊ नये, यासाठी यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. दिवाळीपूर्वी राज्यात साखरेचे किरकोळ दर ८० रुपयांपर्यंत पोहोचले होते. केंद्र सरकारने साखरेच्या साठ्यावर निर्बंध आणत हस्तक्षेप केल्यानंतर सध्या दर काहीसे नियंत्रणात आले आहेत.सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन गाळप हंगाम लवकर सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यातील ऊस उत्पादकांसमोर वेगळेच संकट उभे राहिले आहे. पाऊस, वीज आणि पाण्याच्या कमतरतेमुळे उसाची वाढ खुंटली असून, सध्या साखरेचा उतारा सात ते साडेसात टक्क्यांपर्यंतच असल्याचे चित्र आहे.
महिनाभर आधी गाळप सुरू झाल्यास उसातील साखर उतारा कमी असल्याने कारखान्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, उसाची पूर्ण वाढ न झाल्याने शेतकऱ्यांना कमी वजन मिळण्याची भीती आहे. त्यामुळे लवकर गाळप सुरू करण्याचा निर्णय कारखानदार आणि शेतकरी या दोन्ही घटकांसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.दरम्यान, परतीचा पाऊस झाला नाही तर जिल्ह्यातील ऊस उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाऊस न झाल्यास चारा उपलब्धतेवरही परिणाम होऊन चाराटंचाई निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत पशुधनासाठी वैरण म्हणून उसाची मागणी वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी गाळप लवकर सुरू करण्याचे सरकारी नियोजन आणि दुसरीकडे प्रतिकूल हवामानामुळे घटलेले ऊस उत्पादन, यामध्ये समतोल साधण्याचे आव्हान सरकारसमोर राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड