
कोल्हापूर, 31 ऑगस्ट (हिं.स.)। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेंतर्गत राधानगरी 33/11 के.व्ही. उपकेंद्रात उभारण्यात आलेल्या अतिरिक्त 5 मेगावॅट क्षमतेच्या नवीन रोहीत्र स्थापित करुन कार्यान्वित केल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिवसा अखंडित वीज पुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेंतर्गत राधानगरी 33/11 के.व्ही. उपकेंद्रात उभारण्यात आलेल्या अतिरिक्त 5 मेगावॅट क्षमतेच्या नवीन रोहीत्रचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राधानगरी पंचायत समिती सभापती आर. वाय. पाटील, राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, गट विकास अधिकारी डॉ. संदिप भंडारे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय भनणे, उप कार्यकारी अभियंता ओंकार डांगे, शाखा अभियंता सुशांत निकम, यंत्रचालक, तांत्रिक कर्मचारी, शेतकरी व वीज ग्राहक प्रतिनिधी उपस्थित होते.
लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री आबिटकर म्हणाले, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेंतर्गत 5 मेगावॅट क्षमतेचा नवीन रोहित्र स्थापित करुन कार्यान्वित केल्यामुळे राधानगरी, हत्तीमहाल, बनचीवाडी, शेटकेवाडी, फेजीवडे, फराळे, काळाम्मावाडी, डवरवाडी, लिंगाचीवाडी, सो. शिरोली, कुडूत्री, पिरळ, पडळी, सावर्धन, जोंधळेवाडी व दळवेवाडी या परिसरातील एकूण 652 शेतकऱ्यांना आता दिवसा अखंडित वीज पुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी राधानगरी मतदार संघातील वाळवे, सोळांकुर व आवळी या ठिकाणी नवीन रोहित्र स्थापित करुन कार्यान्वित केले आहे. यामुळे राधानगरी मतदार संघ हे 100 टक्के दिवसा वीज पुरवठा करणारा मतदार संघ ठरला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar