
जळगाव,, 31 ऑगस्ट (हिं.स.) मा.भारत निवडणूक आयोगाने १ नोव्हेंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रारूप मतदार याद्या आज ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात प्रारूप मतदार यादीनुसार एकूण ३० लाख ३७ हजार ४५६ मतदार आहेत. प्रारूप मतदार यादी संबंधित मतदान केंद्रे, तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तसेच jalgaon.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ असून या कालावधीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६, नोंदीतील दुरुस्तीसाठी नमुना ८ आणि नोंद वगळण्यासाठी नमुना ७ भरता येईल. हे अर्ज voters.eci.gov.in वर ऑनलाईन उपलब्ध आहेत. ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विसंगत नोंदींबाबत नोटिसा बजावून सुनावणी घेण्यात येईल तसेच प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होईल. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम २४ अंतर्गत अपीलाची तरतूद असून मतदार नोंदणी अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध कलम २४(अ) अन्वये जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे अपील करता येईल. तसेच पहिल्या अपीलीय प्राधिकरणाच्या निर्णयाविरुद्ध कलम २४(ब) नुसार, मतदार नोंदणी नियम, १९६० च्या नियम २७ अन्वये विहित पद्धतीने मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे दुसरे अपील दाखल करता येईल. जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या पूर्वीच्या ३ हजार ६७७ वरून प्रस्तावित ३ हजार ७०२ करण्यात आली आहे. नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून १९५० हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित आहे. हा क्रमांक सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे. तसेच ECINET अॅपमधील Book a Call With BLO सुविधेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणनापत्रक (Enumeration Form) BLO कडे जमा न केलेल्या ५ लाख १४ हजार ८३६ मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. यामध्ये मयत मतदार ९३ हजार ७०९, गैरहजर मतदार ९५ हजार ८०८, कायमस्वरुपी स्थलांतरित मतदार २ लाख ६२ हजार, ५४५, इतर मतदार १ हजार ७४० आणि यापूर्वीच नोंदणी झालेले झालेल्या ६१ हजार ३४ मतदारांचा समावेश आहे. मयत मतदार वगळता पात्र मतदारांनी नाव समाविष्ट करण्यासाठी विहित कालावधीत दावे दाखल करावेत.
जिल्ह्यातील सर्व पात्र मतदार आणि Uncollectable वर्गवारीतील नागरिकांनी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे आपले दावे व हरकती दाखल कराव्यात. तसेच १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकास किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी नमुना ६ भरून मतदार यादीत आपले नाव नोंदवावे व लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, रोहन घुगे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर