
नंदुरबार, 06 ऑगस्ट (हिं.स.) दुर्गम, आदिवासी व पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या भागांतील एकही पात्र नागरिक आयुष्मान भारत
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या लाभापासून
वंचित राहू नये, यासाठी आयुष्मान कार्ड ई-केवायसी मोहिमेला अधिक गती देऊन गावागावांत विशेष
अभियान राबवावे. शासकीय तसेच योजनेशी संलग्न खासगी रुग्णालयांमार्फत गुणवत्तापूर्ण, पारदर्शक व
कॅशलेस आरोग्य सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य
करावे, असे निर्देश आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश स. शेटे यांनी दिले.
नंदुरबार येथे नियोजन सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री
जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत
जिल्ह्यातील योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीला जिल्हाधिकारी
डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.
विनय सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित
उपस्थितीत होते.
बैठकीत जिल्ह्याची भौगोलिक व सामाजिक परिस्थिती सादर करण्यात आली. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5,955
चौ. कि. मी., अंदाजित लोकसंख्या 20,32,563, 6 तालुके, 639 ग्रामपंचायती, 943 महसुली गावे, 113
नवसंजीवनी गावे, 1,021 पाडे-वस्त्या, पावसाळ्यात संपर्क तुटणारी 201 गावे आणि वर्षभर संपर्क
तुटणारी 69 गावे असल्याने आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष नियोजन
करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेताना 1 वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय, 2 महिला
रुग्णालये, 2 उपजिल्हा रुग्णालये, 12 ग्रामीण रुग्णालये, 64 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 293 आयुष्मान
आरोग्य मंदिरे (आरोग्य उपकेंद्रे), 3 नागरी आरोग्य केंद्रे, 10 प्राथमिक आरोग्य पथके, 8 आयुर्वेदिक
दवाखाने, 40 भरारी पथके, 9 नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे, 5 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला
दवाखाने आणि 2 ॲलोपॅथिक दवाखाने कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्यांचा आढावा घेण्यात आला. 1 जुलै 2024 पासून पात्र कुटुंबांना दरवर्षी
₹5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य संरक्षण, कॅशलेस उपचार, कुटुंब फ्लोटर सुविधा तसेच तपासण्या,
शस्त्रक्रिया, औषधे आणि रुग्णालयीन खर्च शासनाकडून दिला जात असल्याचे सांगण्यात आले. अंत्योदय
अन्न योजना (AAY), प्राधान्य कुटुंब (PHH), शुभ्र शिधापत्रिका धारक तसेच महाराष्ट्राचे अधिवास
प्रमाणपत्र असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळत असून यामध्ये 2,399 हून अधिक आजार व
शस्त्रक्रियांचा समावेश आहे. लाभार्थ्यांना शासकीय तसेच योजनेशी संलग्न खासगी रुग्णालयांमध्ये
उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.
बैठकीत आयुष्मान वय वंदना कार्ड अभियानाचाही आढावा घेण्यात आला. 70 वर्षे व त्यावरील सर्व ज्येष्ठ
नागरिकांना उत्पन्नाची कोणतीही अट न ठेवता या योजनेचा लाभ दिला जात असून गावागावांत विशेष
शिबिरे घेऊन आधार ई-केवायसीच्या माध्यमातून कार्ड तयार करण्यात येत असल्याची माहिती सादर
करण्यात आली.
जिल्ह्यात सध्या योजनेअंतर्गत 95 रुग्णालये कार्यरत असून त्यामध्ये 1 वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्य
चिकित्सकांच्या अखत्यारीतील 84 शासकीय आरोग्य संस्था आणि 10 संलग्न खासगी रुग्णालयांचा समावेश
आहे. नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवा, नवापूर, धडगाव आणि शहादा या सर्व तालुक्यांमधील शासकीय
आरोग्य संस्था योजनेशी जोडण्यात आल्या आहेत. तसेच स्मित हॉस्पिटल, पटेल सर्जिकल अँड एंडोस्कोपी
क्लिनिक, डॉ. चंद्रकांत अशोक जोशी हॉस्पिटल, मेडिकेअर सर्जिकल अँड डेंटल हॉस्पिटल, छत्रपती
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, सुश्रुत नर्सिंग होम, जय श्री दत्ता ॲक्सिडेंट हॉस्पिटल, रुख्मिणी ॲक्सिडेंट
हॉस्पिटल (शहादा), जगदीश हॉस्पिटल आणि श्रेयस ॲक्सिडेंट हॉस्पिटल या खासगी रुग्णालयांमध्येही
योजनेअंतर्गत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.
योजनेच्या एकूण कामगिरीचा आढावा घेताना जिल्ह्यात आतापर्यंत 5,979 प्री-ऑथरायझेशन मंजूर
करण्यात आले असून त्यांची एकूण रक्कम ₹11,19,98,095 इतकी आहे. तसेच 1,654 दाव्यांद्वारे
₹3,91,59,927 इतकी रक्कम लाभार्थ्यांना अदा करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय,
ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच संलग्न खासगी रुग्णालयांनी योजनेच्या प्रभावी
अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अखत्यारीतील जिल्हा रुग्णालय नंदुरबार, महिला रुग्णालय नंदुरबार, ग्रामीण
रुग्णालय म्हसावद, ग्रामीण रुग्णालय खोंडामाळी, ग्रामीण रुग्णालय खांडबारा, ग्रामीण रुग्णालय रानाळा,
ग्रामीण रुग्णालय विसरवाडी, ग्रामीण रुग्णालय धानोरा, ग्रामीण रुग्णालय शहादा, उपजिल्हा रुग्णालय
तळोदा, ग्रामीण रुग्णालय मोलगी, ग्रामीण रुग्णालय धडगाव, ग्रामीण रुग्णालय नटावद, ग्रामीण रुग्णालय
अक्कलकुवा, ग्रामीण रुग्णालय जामणा आणि ग्रामीण रुग्णालय तोरणमाळ यांच्या कामगिरीचा तसेच
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अखत्यारीतील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या तालुकानिहाय
कामगिरीचा आढावा घेण्यात आला.
आयुष्मान भारत गोल्डन कार्ड अभियानात जिल्ह्यातील 14,83,372 लक्षित लाभार्थ्यांपैकी 7,46,372
नागरिकांची ई-केवायसी पूर्ण झाली असून हे प्रमाण 50.35% इतके झाले आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये हे
प्रमाण 38% होते. तसेच 76,146 लक्षित ज्येष्ठ नागरिकांपैकी 25,410 नागरिकांची आयुष्मान वय वंदना
कार्ड अंतर्गत ई-केवायसी पूर्ण झाली आहे.
ई-केवायसी मोहिमेला गती देण्यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यात 310 आशा सेविका, 623 सीएससी केंद्रे
आणि 229 रास्त धान्य दुकाने अशा एकूण 1,162 लॉगिन्स पुन्हा सक्रिय केले आहेत. विविध विभागांच्या
समन्वयातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना यावेळी डॉ. शेटे यांनी दिल्या.
10 जून ते 4 ऑगस्ट 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात 6,15,853 लक्षित
लाभार्थ्यांपैकी 37,688 नागरिकांची आयुष्मान कार्ड ई-केवायसी पूर्ण झाली असून एकूण प्रगती 6.12%
झाली आहे. तालुकानिहाय आढाव्यात शहादा (10.83%), नवापूर (10.69%) आणि तळोदा (9.34%)
येथे उल्लेखनीय प्रगती झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी दुर्गम, डोंगराळ आणि पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या भागांमध्ये आशा सेविका, आरोग्य कर्मचारी
आणि विविध पथके प्रत्यक्ष पाड्यांवर जाऊन नागरिकांची ई-केवायसी करून आयुष्मान कार्ड तयार करून
देत असल्याची छायाचित्रे व माहिती सादर करण्यात आली. प्रतिकूल परिस्थितीतही दुर्गम भागातील
नागरिकांपर्यंत आरोग्य संरक्षणाचा लाभ पोहोचविणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याचे डॉ. शेटे यांनी
विशेष कौतुक केले.
यांचा झाला सन्मान..
महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेतन उत्कृष्ठ कार्य करणारे अधिकारी कर्मचारी
डॉ. किसन पावरा, महिला रुग्णालय, नंदुरबार
डॉ. अनिल गावीत, वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, नवापूर.
डॉ. नितेश वसावे, वैद्यकीय अधिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्र धनराट
डॉ. कुंजप्रिया पावरा वैद्यकीय अधिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्र बोरद
डॉ. राजेश वसावे, मेडीकेअर हॉस्पिटल, नंदुरबार
आयुष्यमान भारत अंतर्गत कार्ड निर्मिती व ई-केवायसी उत्कृष्ट काम
श्रीमती मुक्ता गावीत, आशा सेविका उमर्दे
बैठकीच्या शेवटी डॉ. ओमप्रकाश शेते यांनी प्रत्येक पात्र नागरिकाला आयुष्मान योजनेचा लाभ मिळेल
याची खात्री करावी, प्रलंबित ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी, दुर्गम भागात विशेष मोहीम राबवावी,
शासकीय व संलग्न खासगी रुग्णालयांनी गुणवत्तापूर्ण व वेळेत कॅशलेस उपचार उपलब्ध करून द्यावेत आणि
योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर