
लातूर, 06 ऑगस्ट (हिं.स.)।
नांदेड ते बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वरील जळकोट ते पाटोदा बु. दरम्यानच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्याने वाहनचालकांमध्ये - चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
या महामार्गावर दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात अवजड वाहने, चारचाकी व दुचाकींची वर्दळ असते मात्र रस्त्यावर पडलेल्या खोल व रुंद भेगांमुळे वाहनांचे संतुलन बिघडण्याची शक्यता वाढली आहे. रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात या भेगा स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. स्थानिक नागरिकांनी तसेच नियमित प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी संबंधित विभागाने या रस्त्याची तातडीने पाहणी करून दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.
मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी काँग्रेसचे युवा नेते सचिन केंद्रे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सत्यवान पांडे , भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रवी चोले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनराज दळवे यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis