रत्नागिरी : देवरुखच्या सद्गुरु वाचनालयातर्फे खुली लेखन स्पर्धा
रत्नागिरी, 6 ऑगस्ट (हिं.स.) । देवरूख येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयाचे माजी ग्रंथपाल स्व. ल. वा. साने गुरुजी यांचे स्मृतिप्रीत्यर्थ सलग नवव्या वर्षी खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी १) वर्तमान जनआंदोलनांची वास्तवता आण
रत्नागिरी : देवरुखच्या सद्गुरु वाचनालयातर्फे खुली लेखन स्पर्धा


रत्नागिरी, 6 ऑगस्ट (हिं.स.) । देवरूख येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयाचे माजी ग्रंथपाल स्व. ल. वा. साने गुरुजी यांचे स्मृतिप्रीत्यर्थ सलग नवव्या वर्षी खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेसाठी १) वर्तमान जनआंदोलनांची वास्तवता आणि २) डॉ. विजया मेहता यांचे नाट्य चळवळीतील योगदान असे दोन विषय आहेत. शब्दमर्यादा किमान शब्द १२००, तर कमाल शब्द १५०० आहे.

स्पर्धेचे गुणांकन निकष पुढीलप्रमाणे असतील : अ)विषय: खोली आणि विस्तार: गुण– ४०.

ब)मांडणी: आरंभ, मध्य आणि शेवट: गुण- २०.

क)भाषा शैली: ओघवती, आकर्षक आणि आलंकारिक: गुण- २०.

ड) शुद्धलेखन: गुण- १०.

इ)सर्वसामान्य प्रभाव: गुण- १० असे एकूण १०० गुण असतील. स्पर्धेसाठीचा लेख कागदाच्या एका बाजूला समास सोडून सुवाच्य अक्षरात लिहिलेला अथवा टंकलिखित केलेला असावा.

स्पर्धेचे लेख रविवार, दि. ३० ऑगस्ट, २०२६ पर्यंत वाचनालयात ग्रंथपालांकडे सकाळी ९ ते दुपारी १२:०० व सायं.४:०० ते ७:०० यावेळेतआणून द्यावेत किंवा कुरिअर / पोस्टाने पाठवावेत. लेख वाचनालयाच्या ई–मेलवरही हा लेख Unicode मध्ये टाइप करून पाठवावा.

लेखासोबत स्वतंत्र कागदावर स्पर्धकाने आपले पूर्ण नाव, पत्ता, फोन/ मोबाइल नंबर लिहून पाठवावा. स्पर्धेच्या लेखावर कोठेही आपले नाव वा ओळख लिहू नये. स्पर्धेत गुणानुक्रमे प्रथम ३ क्रमांकांना अनुक्रमे १०००, ७५० आणि ५०० रुपयांचे पारितोषिक, ग्रंथभेट आणि प्रमाणपत्र दिले जाईल. काही लेखांचा उत्तेजनार्थ विचार केला जाईल. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

स्पर्धेसंबंधीचे सर्व अधिकार वाचनालयाने राखून ठेवले आहेत. वाचनालयातर्फे जाहीर करण्यात आलेला स्पर्धेचा निकाल सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील. साधारणत: ऑक्टोबर २०२६च्या दुसऱ्या आठवड्यात स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाईल. मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक, ग्रंथ व प्रमाणपत्र वितरण केले जाईल.

स्पर्धेसाठी अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. गजानन जोशी यांनी केली आहे. स्पर्धकांनी पूर्वकल्पना दिल्यास स्पर्धा निकालानंतर १५ दिवसांनी स्पर्धकांना इतरांचे लेख पाहता येतील. स्पर्धेविषयीच्या अधिक माहितीसाठी ९४२३२९७३५८ या मोबाइल क्रमांकावर संपर्क करावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande