
परभणी, 01 सप्टेंबर, (हिं.स.) ग्रामसभेसंबंधी तरतूदीत सुधारणा करावी, ग्रामसभेसंबंधीच्या तरतूदीत आवश्यक त्या सुधारणा कराव्यात तसेच ग्रामपंचायत अधिकार्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने पाऊले उचलावीत या मागणीकरीता या जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी युनियनने येथील जिल्हा परिषद कार्यालयावर मूक मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयापासून या मोर्चास प्रारंभ झाला. काळ्या रुमालासह फितीनिशी सहभागी आंदोलनकर्त्यांनी सर्वसामान्य नागरीकांसह प्रशासनाचेही लक्ष वेधले. मोर्चेकर्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात, ग्रामपंचायत अधिनियमातील ग्रामसभेसंबंधीच्या तरतूदीत सुधारणा करावी, ग्रामसभा बैठकीची संख्या कमी करावी, ग्रामसभा आयोजन व नियोजनाबाबत आवश्यक प्रशासकीय सुधारणा कराव्यात, ग्रामपंचायत अधिकार्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात ठोस उपाययोजना कराव्यात यासह अन्य मागण्या केल्या. तसेच ग्रामसभांमधूनही मोठ्या प्रमाणावर अनुचित घटना घडू लागल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील दुर्देवी घटना हे त्याचे द्योतक आहे, असे निवेदनातून नमूद केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis