
लातूर, ११ सप्टेंबर (हिं.स.)। जळकोट तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची मुदत संपून सहा महिन्यांहून अधिक कालावधी झाला आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये आतापर्यंत संबंधित सरपंचांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, शासनाने आता ग्रामपंचायतींच्या कारभारासाठी अधिकारी स्तरावरील प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार जळकोट तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या सर्व २७ ग्रामपंचायतींचा कारभार आता केवळ दोन प्रशासकांकडे सोपविण्यात आला आहे. दोन्ही अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतींचे विभाजन करून जबाबदारी देण्यात आली आहे.
तालुक्यातील रावणकोळा, हाळदवाढवणा, पाटोदा खुर्द, तिरुका, घोणसी, डोंगरगाव, अतनूर, मरसांगवी, गव्हाण, धामणगाव, येलदरा, चिचोली, सुल्लाळी, एकुगा खुर्द, बोरगाव खुर्द, विराळ, कोळनूर, शेलदरा, वांजरवाडा, वडगाव, बेळसांगवी, सोनवळा, कोनाळी डोंगर, लाळी बु., कुणकी, मेवापूर आणि शिवाजीनगर तांडा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
जळकोट पंचायत समितीच्या पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी जयवंत कोनाळे आणि शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी के. पी. बिरादार यांची या २७ ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता संबंधित ग्रामपंचायतींचा कारभार सरपंचांऐवजी या दोन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालविला जाणार आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis