
लातूर, 11 सप्टेंबर (हिं.स.)। अहमदपूर तालुक्यातील लांजी येथील शेतात जाऊन सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे व अहवाल तातडीने शासनास सादर करावेत, असे निर्देश यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
यावेळी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर, तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे, गटविकास अधिकारी पंकज शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis