
मुंबई, 13 सप्टेंबर (हिं.स.) - श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मस्थान असलेला खेड तालुक्यातील (जि.पुणे) भुईकोट किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून जतन करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे.
किल्ल्याचा ऐतिहासिक तपशील, सीमा, क्षेत्रफळ आदी बाबींची पुनर्तपासणी करण्यात आली करुन याबाबत सुधारित प्रस्तावाला सांस्कृतिक वेळ भागाने मान्यता दिली आहे. लवकरच याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात येईल.
श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मस्थळाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्याचे जतन, संवर्धन आणि भावी पिढ्यांना या इतिहासाची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी भुईकोट किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
“इतिहासाचे जतन ही केवळ जबाबदारी नाही, तर भावी पिढ्यांप्रती आपली बांधिलकी आहे” श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पराक्रमाचा आणि ऐतिहासिक योगदानाचा गौरव करताना त्यांच्या जन्मभूमीचे जतन होणे आवश्यक आहे. भुईकोट किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्यामुळे या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण आणि संवर्धन अधिक प्रभावीपणे करता येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले.
या निर्णयामुळे श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या इतिहासाशी संबंधित महत्त्वाच्या स्थळाच्या संवर्धनाला चालना मिळणार असून, भविष्यात या परिसराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा म्हणून विकास करण्यासही मदत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी