
रत्नागिरी, 13 सप्टेंबर (हिं.स.) । दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवनात अधिक सक्षम आणि स्वावलंबीपणे जगता यावे, यासाठी आवश्यक सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आरएचपी फाउंडेशनतर्फे विविध दिव्यांग व्यक्तींना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत तुळसणी (संगमेश्वर) येथील शकिरा कुरेशी (पोलिओ) यांना वॉकिंग स्टिक, शांताराम लाड (हिमोफिलिया) यांना कुबड्या, साखरपा (संगमेश्वर) येथील शर्मिला चव्हाण (पोलिओ) यांना वॉकिंग स्टिक, देवळे (संगमेश्वर) येथील गौरी काळोखे (पोलिओ) यांना वॉकिंग स्टिक, तर उद्यमनगर (रत्नागिरी) येथील सलीम हाजू (अस्थिव्यंग) यांना व्हीलचेअर प्रदान करण्यात आली. सलीम हाजू यांचा एक पाय ढोपरापासून कापण्यात आला असून दुसऱ्या पायाची तीन बोटे कट झाली आहेत.
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील निवृत्त अधिकारी मनाली मिलिंद देसाई यांनी दिव्यांग व्यक्तींना मदत करण्याची इच्छा आरएचपी फाउंडेशनचे समीर नाकाडे यांच्याकडे व्यक्त केली होती. नाकाडे यांनी दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेल्या विविध साधनांची माहिती देऊन गरजू लाभार्थ्यांना या साधनांची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यांच्या सहकार्याने ही आवश्यक साधने उपलब्ध करून देण्यात आली. दिव्यांग व्यक्तींना केवळ मदत देण्यापेक्षा त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करून त्यांना अधिक सक्षम, आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनविणे, हा आरएचपी फाउंडेशनच्या उपक्रमांचा प्रमुख उद्देश आहे. या साधनांमुळे संबंधित लाभार्थ्यांना दैनंदिन हालचाली आणि जीवनातील विविध कामांमध्ये मोठा आधार मिळणार आहे. वस्तू वाटपाच्या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, समीर नाकाडे यांच्यासह आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी