
छत्रपती संभाजीनगर, 13 सप्टेंबर (हिं.स.)।
सरकारला मराठ्यांची मतं लागतात, पण गोरगरिबांच्या प्रश्नांशी त्यांना काही घेणं-देणं नाही. आमच्या आंदोलनासाठी मदतीचे हात पुढे येत आहेत त्यामुळे त्यांच्यामागे चौकशी लावली जात आहे, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला. चंद्रशेखर बावनकुळे हे बाईच्या पदराआड लपून वार करत आहेत, त्यांचे अधिकारी आता शनिवारी-रविवारीही काम करत आहेत, असा टोलाही जरांगे यांनी लगावला.
मनोज जरांगे यांच्या अंतरवालीत सुरू असलेल्या आंदोलनाचा आजचा 16 वा दिवस आहे. जरांगे हे त्यांच्या समर्थकांसह 15 सप्टेंबर रोजी मुंबईकडे रवाना होणार असून 19 सप्टेंबर रोजी ते मुंबईतील आझाद मैदानात त्यांचे उपोषण कायम ठेवणार आहेत.
मनोज जरांगे म्हणाले की, आता जे काय होईल ते मुंबईत होईल. पहिला मुक्काम पाटोदा आणि दुसरा मुक्काम श्रीगोंदा येथे असेल. 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करणार. आंदोलन एखादा दिवस मागे पुढे करता येतं, पण शेतकऱ्याच्या संसारावर गदा यायला नको. पाऊस असला किंवा ऊन असलं तरी मराठे मुंबईत येणार म्हणजे येणार.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis