
सोलापूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)।
शेतकऱ्यांना शेतातील माल थेट बाजारपेठेपर्यंत सहज पोहोचविता यावा, यासाठी राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजने’ची सांगोला तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. तालुक्यातील १०३ गावांमधून तब्बल १ हजार ५७७ शेतरस्त्यांची नोंद करण्यात आली असून, योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.
या योजनेच्या सांगोला विधानसभा क्षेत्रीय समितीच्या सह-अध्यक्षपदी ॲड. सचिन देशमुख यांची निवड झाली आहे. तालुक्यातील शेतरस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
योजनेच्या पहिल्या टप्प्यात १०३ गावांतील १ हजार ५७७ शेतरस्त्यांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी ६५३ रस्ते महसूल नकाशावर नोंद असलेले आहेत, तर ६३४ रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. उर्वरित रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद आदी विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून तालुक्यातील ३३९ शेतरस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शेतमालाची वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार असून, उर्वरित रस्त्यांच्या कामांनाही गती मिळण्याची अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड