
सोलापूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)।
कमी पाऊस आणि पावसातील खंड हे शासनाच्या निकषांनुसार दुष्काळ परिस्थितीचे महत्त्वाचे ‘ट्रिगर’ मानले जातात. सध्या माळशिरस, सांगोला, मोहोळ आणि बार्शी हे चार तालुके निकष १ आणि निकष २ मध्ये येण्याची शक्यता असल्याने संबंधित तालुक्यांतील परिस्थितीचे बारकाईने मूल्यांकन करण्यात येत आहे.
दुष्काळ परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची पथके प्रत्यक्ष शेत-शिवारात उतरविली आहेत. जिल्हाधिकारी चार तालुक्यांची, अपर जिल्हाधिकारी चार तालुक्यांची, तर निवासी उपजिल्हाधिकारी तीन तालुक्यांची पाहणी करणार आहेत.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी आणि धोत्री, तसेच अक्कलकोट तालुक्यातील वळसंग, कर्देहळ्ळी, कुरनूर, कुरनूर धरण परिसर आणि नाविंदगी येथे पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, पावसातील खंड, जमिनीतील ओलावा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच जनावरांसाठी चारा याबाबत माहिती घेतली.
दुष्काळसदृश्य परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून त्याआधारे आवश्यक उपाययोजना आणि शासकीय मदतीबाबत पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड