

नवी दिल्ली, 08 सप्टेंबर (हिं.स.)। देशभरात खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीला वेग आला असून, ४ सप्टेंबर २०२६ पर्यंत एकूण १०८६.३१ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ११०४.०० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे यंदा एकूण खरीप पिकांच्या लागवड क्षेत्रात १७.६९ लाख हेक्टरची घट नोंदवण्यात आली आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या साप्ताहिक पीक क्षेत्र अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
तांदळाच्या लागवड क्षेत्रात यंदा लक्षणीय घट झाली आहे. ४ सप्टेंबरपर्यंत तांदळाची लागवड ४२१.८२ लाख हेक्टरवर झाली असून, गेल्या वर्षी हे क्षेत्र ४३८.१९ लाख हेक्टर होते. त्यामुळे तांदळाच्या क्षेत्रात १६.३७ लाख हेक्टरची घट झाली आहे. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात तांदळाच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. दुसरीकडे आसाम आणि ओडिशामध्ये तांदळाच्या लागवडीत वाढ झाली आहे.
डाळींच्या बाबतीत मात्र सकारात्मक चित्र दिसून येत आहे. यंदा डाळींची लागवड ११७.१३ लाख हेक्टरवर झाली असून, गेल्या वर्षीच्या ११५.३० लाख हेक्टरच्या तुलनेत १.८४ लाख हेक्टरने वाढ झाली आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, तेलंगणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशात डाळींच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि ओडिशामध्ये मात्र लागवड क्षेत्र घटले आहे. उडीद आणि तूर वगळता मूगाच्या क्षेत्रात काहीशी घट झाली आहे.
श्री अन्न आणि भरड धान्यांच्या लागवड क्षेत्रात यंदा १८१.३९ लाख हेक्टर क्षेत्राची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी हे क्षेत्र १८२.४८ लाख हेक्टर होते. त्यामुळे १.०९ लाख हेक्टरची घट झाली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील घट या एकूण घटीमागील प्रमुख कारण ठरली आहे. राजस्थान, छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये मात्र लागवड क्षेत्र वाढले आहे.
तेलबियांच्या लागवडीतही १.०७ लाख हेक्टरची घट झाली असून, यंदा १९१.९९ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. राजस्थान आणि गुजरातमधील घट लक्षणीय आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात मात्र तेलबियांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. उसाच्या लागवड क्षेत्राततही 0.40 लाख हेक्टरने घट झाल्याचे दिसून येत असून, यंदा ५८.४७ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे.
दरम्यान, ताग आणि मेस्ता पिकांच्या क्षेत्रात ०.१० लाख हेक्टरची वाढ होऊन ते ६.३४ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. बिहार आणि पश्चिम बंगालमधील वाढ यामागे प्रमुख कारण आहे. कापसाच्या लागवडीत मात्र ०.६९ लाख हेक्टरची घट झाली असून, यंदा १०९.१७ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली आहे. राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमधील घट भरून काढण्यात तेलंगणा आणि गुजरातमधील वाढ अपुरी ठरली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule