नवी
दिल्ली, 17 ऑक्टोबर (हिं.स.) : कॅनडाने केलेले सर्व आरोप
फेटाळून लावत भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. संघटित गुन्हेगारीशी संबंधीत
कॅनडाच्या भूमिकेवर परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे.
रॉयल कॅनेडियन
माउंटेड पोलिस (आरसीएमपी) ने आरोप केला होता की बिश्नोई टोळी भारत सरकारच्या
एजंटशी हातमिळवणी करून दक्षिण आशियाई समुदायाला, विशेषत: खलिस्तान समर्थक घटकांना लक्ष्य करत आहे.
याशिवाय पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी असेही म्हटले होते की, भारतीय मुत्सद्दी नरेंद्र मोदी सरकारशी असहमत
असलेल्या कॅनेडियन लोकांची माहिती गोळा करत आहेत. ती भारत सरकारच्या सर्वोच्च
स्तरावर आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीसारख्या गुन्हेगारी संघटनांपर्यंत पोहोचवत आहेत. यापार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसह अनेक हाय-प्रोफाइल गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या
लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित लोकांच्या अटकेसाठी कॅनडाच्या सरकारला विनंती केली
होती. मात्र जस्टिन ट्रुडो यांच्या सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. आम्ही
कॅनडातून बिश्नोई टोळीच्या सदस्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करत असल्याचे जैस्वाल
यांनी सांगितले. गेल्या एका
दशकापासून कॅनडाच्या सरकारकडे प्रत्यार्पणाच्या 26 नावे प्रलंबित असल्याचेही
त्यांनी सांगितले. सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे ज्या लोकांना आम्ही परत पाठवायला
सांगितले होते ते ते कॅनडात गुन्हे करत असल्याचा कॅनडा पोलिसांचा दावा आहे आणि
यासाठी भारताला जबाबदार धरले जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, काही कुप्रसिद्ध गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासाठी
आम्ही विचारले आहे. यामध्ये गुरजिंदर सिंग, गुरप्रीत सिंग, गुरजीत सिंग, लखबीर सिंग लांडा आणि अर्शदीप सिंग
यांचा समावेश आहे. मात्र आजतागायत कॅनडा सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. हा
अतिशय गंभीर मुद्दा असल्याचे जैस्वाल म्हणाले. भारत आणि कॅनडा तणावाचा परिणाम
दोन्ही देशांमधील व्हिसावर होऊ लागला आहे. या संकटाला कॅनडा सरकार जबाबदार आहे.
भारत आणि कॅनडामधील आर्थिक संबंध मजबूत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले
आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी