
हिंगोली, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
'जलयुक्त शिवार'ची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आयोजित बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार 2.0, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा मृद व जल संधारण अधिकारी अनिल कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, वन विभाग, तालुका कृषि अधिकारी, पूर्णा पाटबंधारे, जिल्हा परिषद लघुसिंचन तसेच विविध विभागाचे अधिकारी तसेच जयाजी पाईकराव उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रस्तावित गाव आराखड्यानुसार राबविण्यात येणाऱ्या लघु पाटबंधारे तलाव दुरुस्ती, गाळ काढणे, वनतळे, खोल सलग समतल चर, मातीनाला बांध, अनघड दगडी बांधकाम, गॅबीयन बंधारा, सिमेंट नाला बांध, रोपवन, वृक्ष लागवड, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड, नाला खोलीकरण, पाझरतलाव दुरुस्ती, केटीवेअर, शेततळे, रिचार्ज शॉफ्ट आदी कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी विभागनिहाय दिलेले उद्दिष्ट, झालेले काम, प्रगतीपथावरील कामे तातडीने पूर्ण करुन त्याचा अहवाल सादर करावा, असे सांगून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या कामाचाही आढावा घेतला.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कृषी विभागाच्या विविध योजनेचा आढावा घेतला. यावेळी कृषी समृध्दी योजनेतून जिल्हास्तरीय नाविण्यपूर्ण प्रकल्प उभारण्यासाठी हवामान बदलास अनुकूल पीक पद्धती मॉडेल, बायोपचार उत्पादन युनिट, मूरघास उत्पादन युनिट, हळद मूल्यवृद्धीसाठी शीतगृह, जलतारा, जैवकुंपण, करवंद लागवड, केळी निर्यात प्रकल्प उभारण्याबाबत आढावा घेण्यात आला.
तसेच प्रधानमंत्री पिक विम्याचे दावे अंतिम करुन पिकविम्याची रक्कम वाटप करण्याची कार्यवाही 15 नोव्हेंबर, 2025 पर्यंत पूर्ण करावी अन्यथा पीक विमा कंपनी व संबंधितावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis